चीन-पाकिस्तान युती आणि भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेवरील संभाव्य धोके
भारत, चीन व पाकिस्तान यांच्यातील सामरिक
आणि भौगोलिक तणाव हे नविन बाब नाहीत. मात्र गेल्या काही वर्षांत या तणावांनी गंभीर
रूप धारण केले आहे. विशेषतः चीन-पाकिस्तान यांच्यातील जवळीक आणि भारताच्या विरुद्ध
चालवले जाणारे सुनियोजित डावपेच भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका निर्माण
करीत आहेत.
भारताच्या चारही बाजूंनी निर्माण
झालेल्या धोरणात्मक दबावाचा मुख्य हेतू म्हणजे भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर
अस्थिर करणे, त्याच्या संरक्षण क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे आणि जागतिक
बाजारात त्याच्या वाढत्या प्रभावाला आळा घालणे. चीनने भारताच्या सीमांवर केवळ सैन्य
वाढवली नाही, तर तो थेट भारतातील संस्थांमध्येही शिरकाव करण्याचा प्रयत्न करीत
आहे. 'Confucius Institute', 'TikTok', 'Shein' आणि विविध मोबाइल अॅप्सच्या
माध्यमातून चीन भारतीय मानसिकतेवर परिणाम घडवण्याचा प्रयत्न करीत आहे.
दुसरीकडे पाकिस्तान, जो आधीपासूनच भारतविरोधी
धोरणांसाठी ओळखला जातो, तो आता चीनसोबत आर्थिक, लष्करी आणि गुप्तचर पातळीवर अधिक
सक्रियपणे सहकार्य करत आहे. पाकिस्तानात 'चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर'
(CPEC) चा विस्तार हा केवळ आर्थिक नव्हे तर सामरिकदृष्ट्याही भारतासाठी धोक्याची
घंटा आहे.
हिंदुस्थानातील विविध राज्यांमध्ये,
विशेषतः नक्षलवादी भागांत आणि उत्तर-पूर्व भारतात, काही देशांतर्गत संस्थांनी
शत्रुराष्ट्रांच्या गुप्तचर यंत्रणांशी संबंधित आर्थिक व्यवहार केल्याचे पुरावेही
समोर आले आहेत. काही अभ्यासकांच्या मते, देशांतर्गत अस्थिरता निर्माण करण्यासाठी
चीन आणि पाकिस्तान एकत्रितपणे 'Hybrid War' अर्थात मानसिक, माहिती आणि आर्थिक
युद्ध छेडत आहेत.
भारत सरकारने याविषयी वेळोवेळी कारवाई
केली आहे. अनेक चीनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच संरक्षण उत्पादनांमध्ये
'आत्मनिर्भर भारत' धोरण राबवून भारत स्वतःची क्षमता वाढवत आहे. परंतु ही लढाई केवळ
सरकारपुरती मर्यादित न ठेवता, सर्वसामान्य नागरिकांनीही देशभक्तीची जाण ठेवून
माहिती सुरक्षेपासून आर्थिक निर्णयांपर्यंत जागरूक राहणे आवश्यक आहे.
भारताचा इतिहास हा विजयानंतरच नव्हे,
तर संघर्षानंतरही गौरवशाली राहिला आहे. म्हणूनच चीन-पाकिस्तानसारख्या
शत्रुराष्ट्रांच्या कारवायांवर मात करण्यासाठी भारताला सामर्थ्य, संघटन, आणि
सजगतेने पुढे जाण्याची गरज आहे.