बुद्धिमत्ता की प्रज्ञा: खरे यश कशात आहे?
आजच्या जगात ज्ञान, माहिती
आणि यशाच्या मागे धावताना अनेकदा आपण "बुद्धिमत्ता" आणि "प्रज्ञा"
यांच्यातील अंतर विसरतो. दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, पण या दोघांपैकी
खरं समाधान, शांतता आणि यश कोण देतं? हाच प्रश्न आणि त्याचं उत्तर आपण या लेखात पाहणार
आहोत.
बुद्धिमत्ता म्हणजे काय?
बुद्धिमत्ता ही माणसाच्या
मेंदूची क्षमता आहे. तर्क, विचार, वाद-विवाद, मुद्देसूद मांडणी – या सगळ्या गोष्टी
बुद्धिमत्तेच्या अंगात मोडतात. बुद्धिमान व्यक्ती प्रत्येक गोष्ट सिद्ध करण्यासाठी
सतत झटत असते. त्याचं मुख्य लक्ष हे असतं की "मी योग्य आहे, हे सर्वांनी मान्य
करावं."
पण यामध्ये एक धोका आहे. दोन
बुद्धिमान व्यक्ती एकत्र आल्या, तर वाद हा टाळणं अशक्य होऊन बसतं. कारण कोणीही झुकायला
तयार नसतं. आणि इथेच एक नातं, एक चर्चा किंवा एक संबंध बिघडू शकतो.
प्रज्ञा म्हणजे काय?
प्रज्ञा म्हणजे समजूतदारपणा.
केवळ माहिती नसून, त्या माहितीचा योग्य वापर कुठे, केव्हा आणि कसा करायचा हे जाणणं
म्हणजेच प्रज्ञा. प्रज्ञावान माणूस वाद टाळतो, शांतता प्राधान्य देतो. तो “कधी बोलावं
आणि कधी गप्प राहावं” याची जाण ठेवतो.
तो दुसऱ्याच्या चुका लक्षात
घेतो पण त्यावर थेट टीका करत नाही. त्याऐवजी तो योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो.
त्याचं बोलणं सुसंस्कृत आणि समजूतदार असतं. त्याला आपल्या ज्ञानाचा गर्व नसतो, उलट
त्याला सतत वाटतं की अजून खूप काही शिकायचं आहे.
दोघांमध्ये मुख्य फरक
बुद्धिमान माणूस आपल्या बोलण्यात
आणि कृतीत "मी" ला पुढं ठेवतो. त्याला इतरांनी आपली प्रशंसा करावी असं वाटतं.
त्याच्या डोक्यात अनेक गोष्टी साठलेल्या असतात – ज्यांनी त्याला दुखावलं, अपमान केलं
– आणि योग्य वेळ आली की तो सूड घेतो.
पण प्रज्ञावान माणूस फक्त
चांगल्या गोष्टी लक्षात ठेवतो. ज्यांनी त्याला प्रेम दिलं, मदत केली, त्यांच्याविषयी
कृतज्ञ असतो. तो चांगल्या विचारांचा संग करू इच्छितो, वादात पडत नाही.
खरं यश कुठं आहे?
बुद्धिमत्ता तुम्हाला यश देऊ
शकते, पण तो यश तात्पुरता आणि अस्वस्थ करणारा ठरतो. प्रज्ञा मात्र तुम्हाला शांत, समाधानी
आणि लोकप्रिय बनवते. एक बुद्धिमान माणूस आयुष्यभर काही ना काही सिद्ध करत राहतो, पण
प्रज्ञावान माणूस आयुष्य समजून घेतो आणि समाधानाने जगतो.
निष्कर्ष
आपल्या आयुष्यात "परसेंटेज"
मिळवण्याच्या मागे लागणं थांबवा. त्याऐवजी "काबिलियत" मिळवण्याचा प्रयत्न
करा. बुद्धिमत्ता पेक्षा प्रज्ञेची गरज आजच्या समाजाला अधिक आहे. निर्णय तुमचाच आहे
– तुम्हाला बुद्धिमान बनायचंय की प्रज्ञावान?